मराठीत नुकत्याच निघू लागलेल्या नियतकालिकांनीही ह्या संशोधनपर लेखनास प्रसिध्दी
देऊन फार मोठा हातभार लावला. जनजागृती हा प्रधान उद्देश केसरीसारख्या
वर्तमानपत्राचा होता तर प्रबोधन, साहित्य-शास्त्र मनोरंजन अशी विविध उद्दिष्ट्ये ठेवणा-या
नियतकालिकांची संख्याही कमी नव्हती. 1832
साली बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. त्यांच्याही
आधी कोण्या मिशन-याने मराठी वर्तमानपत्र सुरू केले होते म्हणतात. पण ह्या
नियतकालिकाच्या कोणताच पुरावा अस्तित्वात नाही. पण एक मात्र खरे की 1832 पासून
पन्नास वर्षात महाराष्ट्रात जी अनेक नियतकालिके सुरू झाली त्यात खानदेशातील जळगाव
येथे ‘काव्यरत्नावली’ ह्या संपूर्णपणे कवितेला वाहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नियतकालिकचे स्थान अनन्यसाधारण
आहे. ह्या मासिकाने मराठी कवितेचा इतिहास घडवला हे सांगूनही आज कोणाला खरे वाटणार
नाही. 1862 साली जन्मलेले नारायण नरसिंह फडणीस उर्फ नानासाहेब फडणीस ह्यांनी
जळगावसारख्या पुण्यापासून (पुणे हे त्या काळी विव्दत्तेचे केंद्र होते.) लांब
असलेल्या गावात छापखाना काढला. पाठोपाठ त्यांनी 1880 साली (काँग्रेसच्या
स्थापनेच्या आधी! ) ‘प्रबोधचंद्रिका’ तर 1887 साली ‘काव्यरत्नावली’
ही दोन नियतकालिके
सुरू केली. प्रबोधचंद्रिका हे तर उघड उघड टिळकांच्या राजकारणाचा पुरस्कार
करण्यासाठी होते.
भूतपूर्वसहसंपादक, लोकसत्ता